Geetanjali Wangchuk : दिल्लीत अभूतपूर्व उद्रेक! संसदेवर धडकणाऱ्या ‘सीजेपी’च्या महामोर्चावर पोलिसांचा अश्रूधूर; गीतांजली वांगचुक यांची सरकारवर घणाघाती टीका

spot_img

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी देशभरातील तरुणांचा एल्गार; गृहमंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात खलबतं सुरू

वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट-युजी’मधील (NEET UG) कथित पेपरफुटी आणि शैक्षणिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज, २० जुलै रोजी देशाची राजधानी दिल्ली अक्षरशः पेटून उठली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुख्य मागणीसाठी जंतरमंतर ते संसद भवन असा धडक महामोर्चा काढण्यात आला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निघालेल्या या मोर्चाला देशभरातील लाखो तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. आंदोलक विद्यार्थी घोषणाबाजी करत थेट संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. मात्र, त्यांना रोखण्यासाठी तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी आणि पोलिसांनी आंदोलकांवर थेट अश्रूधुराच्या नळकांड्या (Tear Gas) फोडल्या, ज्यामुळे जंतरमंतर आणि संसद परिसरात मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला आहे.

या संपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत उपोषण करणारे प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांनी आजच्या घडामोडींवर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि सरकारी यंत्रणांवरून आपला विश्वास उडाल्याचे स्पष्ट केले. “दिल्लीत ज्या प्रकारे इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प करण्यात आली आहे, ते पाहता हे सरकार देशाला कधीच ‘विश्वगुरु’ बनवू शकत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावर बोलताना गीतांजली वांगचुक म्हणाल्या, “माझा कोणत्याही सरकारी यंत्रणेवर किंवा त्यांच्या हेतूंवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. म्हणूनच मला सोनम वांगचुक यांना तातडीने दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवायचे आहे.”

गीतांजली वांगचुक यांनी पुढे सरकारला खडे बोल सुनावताना सांगितले की, “आमचा हा लढा वैयक्तिक नसून संपूर्ण भ्रष्ट सरकारी व्यवस्थेविरोधात आहे. हे सरकार सामान्य जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे काम करत नाहीये. संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात देशाची शिक्षण व्यवस्था हाच सर्वात महत्त्वाचा आणि सर्वोच्च प्राधान्याचा विषय असला पाहिजे. भारताची शैक्षणिक व्यवस्था जगात सर्वोत्तम करण्यासाठी सरकारने आता ठोस आणि कठोर पावले उचलली पाहिजेत. मात्र, या सुधारणांची सुरुवात आधी त्या व्यक्तींपासून झाली पाहिजे जे आपली नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. म्हणूनच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे.” आपण सर्वजण देशाच्या आणि कोट्यवधी तरुणांच्या भविष्यासाठी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी संसदेसमोरील या आंदोलनाविषयी माहिती देताना सांगितले की, प्रशासनाने कितीही दबाव आणला किंवा बळाचा वापर केला, तरी विद्यार्थ्यांचा हा मोर्चा अत्यंत शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गानेच पुढे नेला जात आहे. दरम्यान, या अभूतपूर्व जनक्षोभामुळे आणि विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे मोदी सरकार बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनाची आक्रमकता आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची वाढती मागणी लक्षात घेता, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात दिल्लीत तातडीची आणि महत्त्वाची बैठक सुरू असून, यावर सरकार काय निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ