विद्यार्थ्यांच्या आंदोलनापूर्वीच दगडांचे ट्रक कुणी आणले? २४ तास आधीच्या ट्विटने बावनकुळेंचे दावे ठरवले फोल
कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली तरुणांनी सोमवारी (२० जुलै) थेट संसदेवर काढलेल्या धडक मोर्चामुळे संपूर्ण देशाचे आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधले गेले. या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीमारात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी आणि रक्तबंबाळ झाले. मात्र, या हिंसक कारवाईनंतर आंदोलनात दगड कुठून आले? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संसदेवरील या मोर्चाला ‘नौटंकी’ म्हटले. तसेच, २ ते ३ ट्रक भरून दगड आणून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी २१ जुलै रोजी केली.
मात्र, महसूल मंत्री बावनकुळे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नातील हवा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या एका जुन्या ट्विटने काढून टाकली आहे. बावनकुळे यांनी आरोप करण्याच्या तब्बल २४ तास आधीच, म्हणजेच २० जुलै रोजी सकाळी ६:२४ वाजता, अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर दगड भरलेल्या दोन ट्रक्सचा व्हिडिओ शेअर केला होता. “शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दगडफेकीच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रशासनाचा कट आहे का?” असा थेट सवाल त्यांनी दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारला विचारला होता.
बावनकुळेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना दिपके यांनी सांगितले की, आंदोलनाला बदनाम करण्यासाठीच जंतरमंतरवर दगड आणून टाकण्यात आले होते. “जिथे प्रत्येक विद्यार्थ्याची बॅग तपासली जात आहे आणि कडक नजर ठेवली जात आहे, तिथे दगडांनी भरलेले ट्रक्स आलेच कसे? हे शोधण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांची आहे,” असे सांगत त्यांनी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप केला. दिपके यांनी २४ तास आधीच ही बाब उघड केल्यामुळे आता संशयाची सुई आंदोलकांवरून हटून थेट दिल्ली पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दिशेने वळली आहे.




