Sonam Wangchuk : वांगचुक यांना रुग्णालयात हलवताच दिल्लीत आंदोलनाचा भडका; आता अभिजीत दीपके बसणार आमरण उपोषणाला!

spot_img

“माझ्या परवानगीशिवाय कोणतंही औषध देऊ नका”, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांचा ‘एक्स’वरून इशारा; तब्येत स्थिर असल्याचा डॉक्टरांचा दावा

नीट (NEET) पेपरफुटी घोटाळ्याविरोधात गेल्या २१ दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आता हे आंदोलन आणखीनच पेटले आहे. वांगचुक यांना बळजबरीने हटवल्यामुळे उपोषणस्थळावरील इतर आंदोलक अत्यंत आक्रमक झाले असून, आंदोलन पुढे नेण्यासाठी ‘कॉकरोच जनता पक्षा’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आता स्वतः आमरण उपोषणाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे वांगचुक यांना हटवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

सोनम वांगचुक यांना शनिवारी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर, त्यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या स्वतः रुग्णालयात उपस्थित असून त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्विटर) वर थेट पोस्ट करत प्रशासनाला ताकीद दिली आहे. “माझी, आमच्या कुटुंबातील सदस्यांची किंवा त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांची लेखी परवानगी असल्याशिवाय सोनम यांना कोणतेही औषध तोंडावाटे (Orally) किंवा शिरेवाटे (IV) देऊ नये,” अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. सलग २०-२१ दिवसांच्या उपोषणामुळे वांगचुक यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमालीचे कमी झाले असून त्यांना प्रचंड अशक्तपणा आला आहे.

दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली हायकोर्टाचे निर्देश आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच वांगचुक यांच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सफदरजंग रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या वांगचुक यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून, प्रदीर्घ उपोषणामुळे त्यांचा रक्तदाब (Blood Pressure) आणि रक्तातील साखर (Sugar) काही प्रमाणात कमी झाली आहे; मात्र सुदैवाने त्यांचा ईसीजी (ECG) रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आला आहे.

पोलिसांनी सोनम वांगचुक यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात नेल्यानंतर आंदोलन मागे न घेता ते अधिक तीव्र करण्याचा निर्णय सहकाऱ्यांनी घेतला आहे. कार्यकर्ते अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की, “मी आजपासून आमरण उपोषण सुरू करत आहे.” वांगचुक यांच्या अनुपस्थितीतही विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि नीट परीक्षेतील अन्यायाविरोधात हा लढा जंतरमंतरवर असाच सुरू राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या नव्या घडामोडींमुळे दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ