स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १७ जागांसाठी महायुतीत दीर्घ चर्चेनंतर शिक्कामोर्तब; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज, २५ मे पासून १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून २२ जून रोजी या जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच आणि मनधरणीचे नाट्य अखेर संपले असून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपाच्या या अंतिम तडजोडीत भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वाधिक १२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ४ जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) १ जागा देण्यात आली आहे.
या निवडणुकीत सुरुवातीला शिवसेना ७ जागांवर ठाम होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, त्यामुळे आता जास्त जागा मिळाव्यात, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मात्र, दीर्घ चर्चेनंतर शिवसेनेला ४ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी-हिंगोली हे मतदारसंघ जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही एकमेव जागा मिळाली असून, भाजपने पुणे मतदारसंघावरील आपला दावा कायम ठेवला आहे. या संपूर्ण जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात अंतिम घोषणा केली जाईल.




