पचन, साखर आणि वजनावर होतो थेट परिणाम; रोजची सवय बदलली नाही तर वाढू शकतात आरोग्याच्या तक्रारी
आपल्या देशात चहा आणि बिस्कीट यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. अनेकांसाठी सकाळची सुरुवात चहा-बिस्कीटांशिवाय अपूर्णच वाटते. हलका, सोपा आणि पटकन होणारा नाश्ता म्हणून बिस्कीटांकडे पाहिलं जातं. मात्र, ही रोजची सवय जितकी सामान्य वाटते, तितकीच ती आरोग्यासाठी घातक ठरू शकते, हे फार कमी लोकांना माहिती आहे.
चहा आणि बिस्कीट एकत्र घेतल्याने शरीरातील पचनसंस्था, रक्तातील साखरेची पातळी आणि चयापचय यंत्रणेवर थेट परिणाम होतो. बाजारात सहज उपलब्ध असलेली बहुतेक बिस्किटे मैदा, जास्त प्रमाणातील साखर आणि प्रिझर्व्हेटिव्जपासून तयार केली जातात. सकाळी उपाशीपोटी चहाबरोबर अशी बिस्किटे खाल्ल्यास रक्तातील साखर अचानक वाढते, ज्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
उपाशीपोटी चहा प्यायल्याने त्यातील कॅफिन आणि टॅनिन पोटातील आम्लाचे प्रमाण वाढवतात. त्यातच बिस्किटांमधील रिफाइंड पीठ आणि साखर ऍसिडिटी, जळजळ आणि पोटदुखी वाढवू शकते. सकाळी सर्वात आधी गोड आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स घेतल्यामुळे साखर झपाट्याने वाढते आणि तितक्याच वेगाने कमी होते. ही सवय दीर्घकाळ टिकल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
चहा-बिस्कीट एकत्र खाल्ल्याने आतड्यांमधील उपयुक्त बॅक्टेरिया कमजोर होतात. परिणामी पचनशक्ती कमी होते आणि गॅस, पोट फुगणे, जडपणा यांसारख्या तक्रारी वाढतात. चहामधील टॅनिन शरीरातील पाण्याची पातळी कमी करू शकते, तर बिस्किटांमध्ये फायबर कमी असल्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोट नीट साफ न होण्याच्या समस्या उद्भवतात.
याशिवाय, रिफाइंड पीठ, साखर आणि अपायकारक चरबी असलेली बिस्किटे सकाळी घेतल्याने शरीरात चरबी साठू लागते. याचा थेट परिणाम वजनवाढीवर होतो. त्यामुळे रोजचा चहा-बिस्कीटचा नाश्ता आरोग्यासाठी हळूहळू घातक ठरू शकतो.
हे नुकसान टाळण्यासाठी सकाळची सुरुवात पोटासाठी आणि मेटॅबॉलिझमसाठी फायदेशीर पर्यायांनी करणं अधिक योग्य ठरेल. चहा-बिस्कीटाऐवजी बडीशेपचं पाणी, धण्याच्या बियांचं पाणी, कोरफडीचा रस किंवा नारळपाण्यात थोडी दालचिनी मिसळून दिवसाची सुरुवात केल्यास शरीराला चांगला फायदा होऊ शकतो. छोट्या सवयी बदलून तुम्ही मोठ्या आरोग्य समस्या टाळू शकता.




