स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांत असंतोष वाढतोय; भाजपकडून शिंदे गटात झालेली इनकमिंग चर्चेत
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, पक्षांतराची मोठी लाट उसळलेली दिसत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतून अनेक नेते महायुतीत दाखल होत असतानाच, आता महायुतीतल्या पक्षांतही अस्वस्थता वाढताना दिसत आहे. विशेषत: शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
शिंदे गटातील मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत नाराजी थेट दाखवून दिली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सुमारे 50 मिनिटांची भेट घेतली. राज्यातील राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर या भेटीने अधिकच उत्सुकता निर्माण केली. तरीही तिन्ही घटक पक्षांनी महायुतीत सर्व काही सुरळीत असल्याचा दावा कायम ठेवला आहे.
दरम्यान, आता भाजपला हिंगोलीत मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार भास्कर बांगर यांनी अवघ्या एका दिवसावर उमेदवारी मागे घेत शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे. वार्ड क्रमांक 16 ‘ब’ मधून त्यांनी भाजपच्या तिकीटावर अर्ज दाखल केला होता. मात्र अचानक निर्णय बदलत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून माघारीची माहिती दिली.
या अनपेक्षित घडामोडीमुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून, भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतराने महायुतीतील अंतर्गत समीकरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.




