देशातील शिक्षण पद्धती आणि विविध राजकीय घडामोडींवरवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. देशातील कुलगुरूंची नियुक्ती सरकार नव्हे तर संघाने केली असून, यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. नेत्यांची मुले परदेशात शिकतात आणि गरीबांच्या मुलांना बोगस शिक्षण पद्धतीचा सामना करावा लागत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. पंडित नेहरूंपासून ते मनमोहन सिंग यांच्या काळात उभारलेल्या आधुनिक शिक्षण संस्थांचा उल्लेख करत, गेल्या दहा वर्षांत सरकारने ती व्यवस्था उद्धवस्त केल्याचे राऊत म्हणाले. परीक्षा यंत्रणा सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय टास्कफोर्सवर आणि नंदन निलेकणी यांच्या नियुक्तीवरूनही त्यांनी टोला लगावला. संघाच्या विचारसरणीचे मंत्री नेमण्याऐवजी निलेकणी किंवा फडणवीसांना शिक्षणमंत्री करा, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच, “मी महाराष्ट्रातच राहीन,” असे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत, “कुठे राहायचे आणि कोणते पद घ्यायचे हे फडणवीसांच्या हातात नसून हवालदारासारखी त्यांची अवस्था झाली आहे,” असा उपरोधिक टोलाही संजय राऊतांनी लगावला. भाजपमध्ये स्वाभिमान उरला नसून सर्व निर्णय मोदी-शहांच्या आदेशानुसारच होतात, अशी टीका त्यांनी केली.




