आंदोलनावरील टीकेचा जाब विचारत दोघांनी दिला होता इशारा; लाड यांच्या मध्यस्थीने सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात पुन्हा चर्चेची दारे खुली होण्याची शक्यता.
भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड हे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे मुक्कामी असताना, त्यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. “आंदोलन सुरू असताना तुम्ही जरांगे पाटलांवर टीका केली होती, मग आता त्यांना भेटायला कसे जात आहात?” असा जाब विचारत दोघांनी त्यांना हॉटेलमध्ये व गाडीवर हल्ला करण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले या दोन तरुणांना ताब्यात घेत अटक केली आहे. सध्या या हॉटेलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रसाद लाड यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांच्या मनात काही शंका असतील तर आपण त्या दूर करू, असे सांगत पोलिसांना त्यांच्यावर कडक कारवाई न करण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आपण मनोज जरांगे पाटील यांच्याच निमंत्रणावरून आणि विनंतीवरून ही भेट घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री उदय सामंत आणि जरांगे यांचे संबंध चांगले असून सरकारच्या भूमिकेनुसार चर्चा पुढे नेण्यासाठी आपण येथे आलो आहोत, असे सांगत लाड हे अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. या महत्त्वाच्या भेटीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




