शासकीय कामासाठी गेलेल्या आत्माराम पाटील यांचा शिरगाव खदान परिसरात निर्घृण खून; भूमाफियांवर कुटुंबियांचा गंभीर आरोप
पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक अत्यंत भीषण घटना मंगळवारी दुपारी घडली. माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची शिरगाव परिसरात १० ते १२ जणांच्या टोळक्याने दगडाने ठेचून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वेळी ही हत्या झाली, त्या वेळी पाटील हे तहसील कार्यालयातील एका मंडळ अधिकाऱ्यासोबत शासकीय पाहणीसाठी गेले होते. ज्या घरात दोन दिवसांपूर्वी लग्नाचे सूप वाजले होते आणि मंगळवारी दुपारी सत्यनारायणाची पूजा सुरू होती, त्याच घरातील कर्त्या पुरुषाचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण विरार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आत्माराम पाटील यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणी स्थानिक भूमाफियांवर थेट आरोप केला आहे. आरोपी भालचंद्र पाटील आणि महेश पाटील यांच्या अनधिकृत बांधकामांविरुद्ध आणि जमीन हडपल्याप्रकरणी आत्माराम यांनी तक्रारी केल्या होत्या. याच रागातून मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या देखतच आरोपींनी आत्माराम यांना संपवले. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी भालचंद्र पाटील ऊर्फ ‘अक्का’ याच्यासह इतर फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. अनधिकृत खदानी आणि बेकायदेशीर जमिनींच्या व्यवहारातून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.




