नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील आखतवाडे गावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मटणाचे जेवण आणि त्यानंतर दही सेवन केल्यानंतर एका शेतकरी वृद्ध दाम्पत्याची तब्येत अचानक बिघडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.
रविवारी रात्री जेवणानंतर काही वेळातच दोघांची प्रकृती गंभीर स्वरूपात बिघडू लागली. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच द्वारकाबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 78 वर्षीय शांताराम ह्याळीज यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे आखतवाडे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमके अन्नातून विषबाधा झाली की अन्य कोणते कारण होते, याबाबत अजून स्पष्टता नाही. स्थानिक यंत्रणांकडून या घटनेची अधिक चौकशी सुरू असून, पुढील तपासातून कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.




