नसरापूर येथील गाजलेल्या अत्याचार प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या भीमराव कांबळे याच्या शिक्षेबाबत आज न्यायालय महत्त्वपूर्ण निर्णय देणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, त्याला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप सुनावली जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चार दिवस चाललेल्या सखोल युक्तिवादानंतर न्यायालयाने भीमराव कांबळी याला दोषी ठरवले असून, आता शिक्षेच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.
ही सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात पार पडली असून, केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण प्रकरणाचा निकालाच्या टप्प्यापर्यंत प्रवास पूर्ण झाला आहे. जलदगतीने चाललेल्या या प्रक्रियेमुळे न्यायालयीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही चर्चा होत आहे. आजचा दिवस या प्रकरणासाठी निर्णायक ठरणार असून, न्यायालयाकडून शिक्षा जाहीर केली जाणार आहे.
प्रकरणाच्या संवेदनशीलतेचा विचार करता न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून परिसरावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. न्यायालयीन कामकाज शांततेत पार पडावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पीडित कुटुंबासह राज्यभरातील नागरिकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विविध सामाजिक स्तरांतून व्यक्त केली जात आहे. आजचा न्यायालयाचा निर्णय या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि अंतिम टप्पा ठरणार असून, त्यावर पुढील सामाजिक आणि कायदेशीर चर्चेची दिशा अवलंबून राहणार आहे.




