केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात ४ ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चाची हाक; विविध मागण्यांसाठी वाढला प्रशासनाचा ताण.
दिल्लीमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून आंदोलनांचे सत्र सुरू असतानाच, आता टॅक्सी आणि पर्यटन वाहतूक व्यावसायिकांनीही केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. देशभरात लागू करण्यात आलेल्या E20 (इथेनॉल मिश्रित पेट्रोल) मुळे वाहनांचे मायलेज घटत असल्याचा आणि इंजिनाचे नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप करत ‘दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशन’ने आगामी ४ ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी हातात ऊस घेत केंद्र सरकारच्या या धोरणावर तीव्र सवाल उपस्थित केले असून, २०१५ पूर्वी तयार केलेली वाहने या इंधनासाठी डिझाईन केलेली नसल्याने E20 पेट्रोलची अघोषित सक्ती तातडीने हटवावी, अशी ठाम मागणी केली आहे.
या आंदोलनामुळे केवळ केंद्र सरकारच नव्हे तर दिल्ली पोलिसांच्या अडचणीतही मोठी वाढ झाली आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या निर्णयामुळे वाहनधारकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, कोणताही वैज्ञानिक आढावा न घेताच हा नियम अचानक लादल्याचा संताप व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, पॅनिक बटण, वाहन लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसची अंमलबजावणी, पर्यटन वाहनांसाठीची ८० किमी प्रतितास वेगमर्यादा, जुन्या वाहनांचे स्क्रॅपेज धोरण, BS-IV डिझेल वाहनांवरील निर्बंध आणि वाढीव टोल दर यांसारख्या अनेक मुद्द्यांवर फेरविचार करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. आधीच NEET पेपरफुटी आणि शेतकरी आंदोलनामुळे त्रस्त असलेल्या सरकारला आता या नव्या वाहतूक आंदोलनाचाही सामना करावा लागणार आहे.




