Maharashtra NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची केवळ चर्चाच; शशिकांत शिंदेंनी स्पष्ट शब्दात विषय संपवला, तर आव्हाडांचा मोदींवर हल्लाबोल

spot_img

‘शरद पवार’ गटाच्या बैठकीपूर्वी नेत्यांची मोठी विधाने; विलीनीकरणाचे वृत्त फेटाळत पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यावरून सरकारला घेरले

गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हापासून या चर्चा अधिक गतिमान झाल्या होत्या. मध्यंतरी हा विषय शांत झाला असतानाच, आता पुन्हा एकदा या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्यांची एक गुप्त बैठक पार पडली, तर आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे विलीनीकरणाच्या अफवांना बळ मिळाले होते. मात्र, यावर पडदा टाकताना शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून अनेक जण त्यांची सदिच्छा भेट घेत असतात, त्यामुळे अशा भेटींचा कोणताही राजकीय किंवा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा अथवा प्रयत्न सुरू नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, आमदार रोहित पवार हे नाराज असून ते आजच्या बैठकीला गैरहजर राहणार असल्याच्या वृत्ताचाही त्यांनी समाचार घेतला. पक्षात कोणीही नाराज नसून केवळ बातम्या चालवण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगत त्यांनी रोहित पवारांच्या नाराजीची चर्चा फेटाळली. आजची बैठक केवळ पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या भविष्यातील वाटचालीचे नियोजन करण्यासाठी बोलावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याच बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला. २०१४ मध्ये ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदींनी १२ वर्षांच्या कारभारानंतर भारतात न बोलता थेट नेदरलँडमध्ये जाऊन देशवासियांना ‘बुरे दिन’साठी तयार राहण्यास सांगितल्याचा टोला आव्हाडांनी लगावला. देशात संकट येणार असेल तर ते परदेशात न सांगता भारतीय जनतेला समोर येऊन सांगायला हवे होते, असे ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी इशारा दिला की, आगामी एका महिन्यात पेट्रोलच्या किमती २० रुपयांनी वाढण्याची शक्यता असून, याचा थेट फटका गरीब जनतेला बसेल. सध्या ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत असून, शेतीसाठी लागणारे पाण्याचे पंप आणि संपूर्ण कृषी व्यवस्था डिझेलवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यास सामान्य माणसाने कसे जगायचे, असा सवाल करत त्यांनी व्हीआयपी संस्कृती बंद करून नागरिकांना सायकल चालवण्याचा सल्ला देणाऱ्या सरकारी धोरणांवर तीव्र आक्षेप घेतला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ