“१० आमदार अन् ८ खासदार…”; मॅजिक फिगरसाठी भाजपचा नवा गेम प्लॅन? वडेट्टीवारांनी दाखवला पुरोगामीत्वाचा आरसा
देशात डेलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. संसदेत काही महत्त्वाच्या विधेयकांसाठी जास्तीत जास्त खासदारांचे संख्याबळ मिळवणे भाजपसाठी आवश्यक झाले आहे. या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालसह महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थेट एनडीए (NDA) म्हणजेच सत्ताधारी महायुतीसोबत घरोबा करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पवार गटाकडे असलेले १० आमदार आणि ८ खासदार हा आकडा भाजपला केंद्रात आणि राज्यात ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
या संभाव्य राजकीय घडामोडींवरून भाजपसोबत सत्तेत वाटेकरी होण्यासाठी शरद पवार यांच्या गोटात हालचाली वेगवान झाल्याचा दावा केला जात आहे. पवार गट थेट सत्तेत सामील होणार की बाहेरून पाठिंबा देऊन भाजपला मदत करणार, यावर पडद्यामागे खलबतं सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याची कुणकुण लागताच राजकीय वातावरण तापले आहे. अर्थात, आमदार रोहित पवार यांनी या बैठकीचे वृत्त तातडीने फेटाळून लावले असले, तरी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या सूचक प्रतिक्रियेने या चर्चांना अधिकच हवा दिली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी थेट भाष्य करत पवार गटाला महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांची आठवण करून दिली. ते म्हणाले, “सध्या या चर्चांना किती अर्थ आहे हे ठाऊक नाही, पण पडद्यामागे चर्चा नक्कीच सुरू आहेत. आता त्यांना वैचारिक रस्ता निवडायचा आहे की सत्तेचा, हे त्यांनीच ठरवावे. पुरोगामी महाराष्ट्राचे पुरोगामीत्व सांभाळून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर चालायचे, की धन, संपत्ती, सत्ता आणि मंत्रिपदावर विश्वास ठेवून काम करायचे, हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे.” वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात ‘ऑपरेशन टायगर’नंतर आता ‘ऑपरेशन तुतारी’चे वारे वाहू लागल्याचा दावा केला जात असून, आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी कलाटणी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




