Jaipur Crime : पोटच्या मुलीनेच रचला आईच्या मृत्यूचा सापळा! जयपूरमधील ‘त्या’ हिट अँड रनचा थरारक खुलासा; नोकरी आणि मालमत्तेसाठी ७ लाखांची सुपारी

spot_img

अपघात समजून पोलीस फाईल बंद करणार होते, पण भावाच्या एका संशयाने उघड केले माय-लेकीच्या नात्यातील रक्तरंजित सत्य; काकांसह ७ जण अटकेत

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये ४ जुलै रोजी घडलेल्या एका कथित रस्ते अपघाताला आता अत्यंत धक्कादायक आणि थरारक वळण मिळाले आहे. एका स्कॉर्पिओ गाडीने दिलेल्या धडकेत नीरज शर्मा (नाव) या महिलेचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा निव्वळ एक दुर्दैवी अपघात वाटत होता, मात्र पोलिसांनी केलेल्या चक्रावून टाकणाऱ्या तपासात हा अपघात नसून एक थंड डोक्याने रचलेला पूर्वनियोजित कट (मर्डर प्लॅन) असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या हत्येची मुख्य सूत्रधार दुसरी कोणी नसून मृत महिलेची २४ वर्षांची पोटची मुलगी आयुषी शर्मा हीच असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आईची सरकारी नोकरी आणि मालमत्ता बळकावण्यासाठी मुलीनेच आपल्या काकांसोबत मिळून ७ लाख रुपयांची सुपारी देऊन हा कट अंमलात आणला होता.

जयपूर ईस्टच्या डीसीपी रंजिता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी मुख्य आरोपी मुलगी आयुषी, काका मोहन यांच्यासह एकूण ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तर काकांचा मुलगा बलराम हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या गुंतागुंतीच्या केसचा छडा लावण्यात कॉन्स्टेबल दयाराम आणि गणेश यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत नीरज शर्मा यांचे पती न्यायालयात एलडीसी (LDC) पदावर कार्यरत होते. सुमारे वर्षापूर्वी त्यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नीरज शर्मा यांना ती सरकारी नोकरी मिळाली होती. मात्र, २४ वर्षीय मुलगी आयुषीला स्वतःला ती सरकारी नोकरी हवी होती. जर आई जिवंत राहिली नाही, तर ती नोकरी आणि वडिलांची सर्व मालमत्ता आपल्यालाच मिळेल, या हव्यासापोटी आयुषीने आपल्या काकांसोबत (मोहन आणि बलराम) मिळून आईलाच रस्त्यातून हटवण्याचा भयानक कट रचला.

४ जुलै रोजी प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नीरज शर्मा यांना एका स्कॉर्पिओने उडवले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मुलगी आयुषीने मामा राकेश कुमार शर्मा यांना फोन करून आईचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र, राकेश यांना भाचीच्या बोलण्यावर संशय आला. त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची बहीण नीरज अनेक दिवसांपासून मानसिक त्रासात होती. तिची मुलगी, दीर मोहन आणि पुतण्या बलराम हे मालमत्तेसाठी तिला वारंवार धमकावत व त्रास देत होते.

राकेश शर्मा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपघाताचा अँगल सोडून गुप्त तपास सुरू केला. तपासात समोर आले की, आयुषी आणि तिच्या काकांनी त्यांचा नातेवाईक हेमंत याला नीरज यांच्या हत्येसाठी ७ लाख रुपयांची सुपारी दिली होती. हेमंतने त्याचे साथीदार आकाश, अरविंद, रोहित आणि मोहित यांच्या मदतीने नीरज शर्मा रस्त्यावरून जात असताना त्यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ घालून अपघात घडवला. पकडण्यात आलेले सर्व आरोपी हे भरतपूरचे रहिवासी असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे. पैशांच्या आणि नोकरीच्या हव्यासापोटी एका मुलीने आपल्याच आईचे कुंकू पुसल्यानंतर तिचा जीवही घेतला, या घटनेने संपूर्ण राजस्थान हादरले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ