२० जुलै हा लोकशाहीतील ‘डरपोक दिवस’; दिल्लीतील पोलीस कारवाईची जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना
दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. “सरकारच्या कालच्या कृत्याने जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली. तिथे जनरल डायरने गोळ्या झाडल्या होत्या, तर इथे भाजपच्या ‘जनरल कायर’ने निष्पाप मुलांवर लाठ्या चालवून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. ज्यांना मुलांचे दुःखाची जाणीव नाही, त्यांना देशातील तरुण पिढीचा आक्रोश कसा कळणार?” असा संतप्त सवाल करत त्यांनी २० जुलै हा दिवस भारतीय लोकशाहीतील ‘काळा दिवस’ आणि ‘डरपोक दिवस’ म्हणून ओळखला जावा, अशी घणाघाती टीका केली.
खासदार मैदानात दिसले नाहीत या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, सरकार लहान विद्यार्थ्यांना घाबरले असून हुकूमशाही पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सर्वजण मैदानातच होतो आणि घटनेनंतर लगेचच जखमी सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी सफदरजंग रुग्णालयात पोहोचलो होतो. तसेच सुप्रिया सुळे यांच्या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, सुप्रिया सुळे यांची तब्येत ठीक नसून डॉक्टरांनी त्यांना घशावर ताण न देण्याचा सल्ला दिला आहे, तरीही त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारले आहे.
आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की, कालच्या घटनेने क्रांतीची ठिणगी पेटली असून आता हा वणवा संपूर्ण देशात पसरेल. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर नेणे गरजेचे आहे. शेतकरीही या आंदोलनात सहभागी होणार होते, परंतु त्यांना शंभू बॉर्डरवरच मोठा बंदोबस्त लावून रोखण्यात आले. तरीही देशातील तरुण आणि शेतकरी आता शांत बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.




