मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेला प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार परत करत मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील टीडीआर प्रकरणात न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यानंतरही प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत त्यांनी शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. या निर्णयामुळे मराठी कलाविश्वात चर्चांना उधाण आले आहे.
उषा चव्हाण यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर हा पुरस्कार परत केला. यावेळी त्यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावर तीव्र शब्दांत टीका केली. पुण्यातील जमिनीच्या टीडीआरसंदर्भातील प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने असूनही प्रशासन योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी पुणे महापालिका आयुक्तांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “नावात राम असलं तरी वागणं तसं नाही,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तर मिळत नसल्याची खंतही त्यांनी मांडली. तसेच, नगरविकास विभागाकडे या प्रकरणाची माहिती पाठवण्यात आल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान, या वेळी अभिनेते मंगेश देसाई देखील उपस्थित होते. त्यांनी उषा चव्हाण यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कलाकारांप्रती संवेदनशील असलेले एकनाथ शिंदे या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या घटनेमुळे पुन्हा एकदा कलाकार आणि प्रशासन यांच्यातील संवादाचा मुद्दा चर्चेत आला आहे.




