“बीडचे उद्योग चोरून गेवराईला नेताय!”; आमदार संदीप क्षीरसागर यांचा विजयसिंह पंडितांवर घणाघाती आरोप
बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या वर्चस्वावरून दोन बड्या नेत्यांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड मतदारसंघातील कामांचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर हा वाद उफाळून आला. या बैठकीला निमंत्रित न केल्याने संतप्त झालेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडत हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिला आहे. क्षीरसागर यांनी पंडित यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, “एकीकडे बीडवर प्रेम दाखवायचे आणि दुसरीकडे बीडमधील एमआयडीसी व रेशीम उद्योगासारखे महत्त्वाचे प्रकल्प गेवराईला पळवून न्यायचे, हा कोणता न्याय?” या आरोपामुळे जिल्ह्याच्या राजकारणात ‘विकास की श्रेयवाद’ यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
संदीप क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पुढे म्हटले की, मतदारसंघाने आम्हाला दोनदा निवडून दिले असून आम्ही काय करावे, हे इतरांनी शिकवण्याची गरज नाही. विमानतळाचा सर्वे असो किंवा बॅक वॉटर योजना, आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे. नगरपालिका निवडणुकीत अजितदादांनी घेतलेल्या कष्टांची आठवण करून देतानाच, “आम्ही अर्ध्या रस्त्यातून किंवा चौकातून पळून जाणारे नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला. दुसरीकडे, सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करताना त्यांनी सूचक विधान केले. “अजितदादांशी शेवटची भेट झाली तेव्हा त्यांनी आपण पुन्हा एकत्र येणार असल्याचे म्हटले होते, मात्र यावर अंतिम निर्णय ‘मोठे साहेब’ (शरद पवार) आणि त्यांचा परिवार घेईल,” असे सांगत त्यांनी भविष्यातील राजकीय बदलांचे संकेत दिले आहेत. या वादामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी बीडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे.




