पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आवळलाय पाण्याचा फास; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकची आंतरराष्ट्रीय स्तरावर तडफड
गेल्या वर्षी (एप्रिल २०२५) पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांचे कंबरडे मोडले होते. एवढेच नव्हे, तर “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही” ही कठोर भूमिका घेत भारताने ऐतिहासिक ‘सिंधु जल करार’ स्थगित केला. भारताच्या या एकाच निर्णयामुळे पाकिस्तानातील शेती आणि पाणीपुरवठ्याची मोठी कोंडी झाली असून, तिथे पाण्यासाठी तीव्र तडफड सुरू आहे. याच हताशेतून आता पाकिस्तानचा संताप अनावर झाला असून, त्यांच्या एका मंत्र्याने भारताला थेट पण पोकळ धमकी दिली आहे.
पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री मुसादिक मलिक यांनी माहिती मंत्री अताउल्ला तरार यांच्यासोबत घेतलेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार, “शेजारील देशाच्या पंतप्रधानांच्या हातात पाण्याच्या नळाचे नियंत्रण असून ते पाकिस्तानात पाण्याचा एक थेंबही वाहू देणार नाही असे म्हणतात,” असा आरोप मलिक यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी वल्गना केली की, “सिंधु जल करारांतर्गत आमच्या हक्काच्या पाण्यावर जर कोणी दावा सांगण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांचे हात छाटून टाकू!”
भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी यापूर्वी थेट युद्धाची भाषा केली होती. तर दुसरीकडे, माहिती मंत्री तरार यांनी हा करार भारत एकतर्फी रद्द करू शकत नाही, असा दावा करत आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, भारताने संयुक्त राष्ट्रात (UN) स्पष्ट केले आहे की, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाला सहा दशके जुन्या कराराचा फायदा सतत घेता येणार नाही. सध्या पाकिस्तानातील अनेक कालवे कोरडे पडले असून, भारताच्या जलनीतीमुळे पाकिस्तान पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे.




