राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, रस्त्यांवर पाणी साचणे, झाडे कोसळणे, वाहतुकीला अडथळे आणि नागरिकांचे हाल अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
अलीकडेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत असलेले एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील पावसाची स्थिती, पूरग्रस्त भागांतील बचावकार्य, नागरिकांची सुरक्षितता आणि आपत्कालीन उपाययोजनांची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले. प्रभावित भागांमध्ये मदतकार्य जलद गतीने पोहोचावे, तसेच आवश्यक यंत्रणा सतत सज्ज ठेवाव्यात, यावरही त्यांनी भर दिला. आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या कामकाजाची माहितीही घेतली.
यापूर्वीही मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक सतर्क राहावे आणि नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या होत्या. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसही राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.




