‘जीना इसी का नाम है’ शोमधील ‘तो’ जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल; एका चित्रपटामुळे पडली मैत्रीत फूट
ग्लॅमरच्या या झगमगत्या दुनियेत दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये निखळ मैत्री असणं दुर्मिळ मानलं जातं. मात्र, एका काळात ऐश्वर्या राय बच्चन आणि राणी मुखर्जी यांची मैत्री संपूर्ण इंडस्ट्रीत एक मिसाल म्हणून पाहिली जायची. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या रायची एक जुनी मुलाखत प्रचंड व्हायरल होत असून, यामुळे या दोन्ही अभिनेत्रींच्या मैत्रीचे आणि त्यानंतर त्यांच्यात आलेल्या दुराव्याचे किस्से पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
या जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याने त्यांच्या घट्ट मैत्रीची सुरुवात कशी झाली, याबद्दल खुलासा केला होता. एका आंतरराष्ट्रीय वर्ल्ड टूर दरम्यान ऐश्वर्या आणि राणी जवळपास ४५ दिवस एकत्र राहिल्या होत्या. या प्रवासात, स्टेज शोच्या सरावादरम्यान आणि एकमेकांच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्यामुळे त्यांच्यात एक घट्ट आणि भावनिक नाते निर्माण झाले होते.
प्रसिद्ध टीव्ही शो ‘जीना इसी का नाम है’ मध्ये बोलताना ऐश्वर्याने म्हटले होते, “लोकांना असे वाटते की एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या दोन अभिनेत्री कधीच चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत. पण आमची मैत्री या गोष्टीला खोटं ठरवते. राणी अत्यंत मनमिळावू आणि सहज स्वभावाची आहे, त्यामुळे आमच्यात कधीच कोणताही संकोच नव्हता.” याच कार्यक्रमात राणी मुखर्जीने प्रकृती ठीक नसतानाही ऐश्वर्यासाठी एक खास व्हिडिओ संदेश पाठवला होता. त्यात तिने “ऐश, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आपण कायम सर्वोत्तम मैत्रिणी राहू,” अशी भावनिक साद घातली होती.
मात्र, काळाच्या ओघात या जिवाभावाच्या मैत्रीला कोणाची तरी नजर लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २००३ मध्ये आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे या दोन्ही अभिनेत्रींच्या नात्यात कायमचा दुरावा आला. या चित्रपटात आधी शाहरुख खानसोबत ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होती. पण काही वाद आणि परिस्थितीमुळे ऐश्वर्याला या चित्रपटातून अचानक हटवून तिच्या जागी राणी मुखर्जीला साइन करण्यात आले.
आपल्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीने आपली जागा घेतल्यामुळे ऐश्वर्या नाराज झाल्याची चर्चा तेव्हा रंगली. याच एका कारणामुळे बॉलिवूडमधील ही सर्वात सुंदर मैत्री हळूहळू संपुष्टात आली. विशेष म्हणजे, ऐश्वर्या किंवा राणी या दोघींनीही या वादावर कधीच जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे त्यांच्यात नक्की काय घडलं, हे आजही एक रहस्यच आहे, पण हा वाद बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात जास्त चर्चिलेल्या मतभेदांपैकी एक ठरला.




