वाढदिवसाला शुभेच्छा देणं टाळलं; सोशल मीडियावरील ‘त्या’ एका कृतीने रंगल्या अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडी म्हणून ओळखले जाणारे अभिनेते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यातील मैत्रीमध्ये काहीतरी बिनसल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. २२ जून रोजी थलपती विजय यांचा ५२ वा वाढदिवस पार पडला. दरवर्षी न चुकता विजय यांना शुभेच्छा देणाऱ्या त्रिशाने यंदा मात्र सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. एवढेच नव्हे तर, त्रिशाने विजय यांना थेट इन्स्टाग्रामवर ‘अनफॉलो’ केल्याचा दावा चाहत्यांनी केला असून, यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आणि सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या वीस वर्षांपासून, म्हणजेच २००४ मधील गाजलेल्या ‘घिल्ली’ चित्रपटापासून या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. त्यानंतर ‘तिरुपाची’, ‘कुरुवी’, ‘लिओ’ आणि अलीकडच्या ‘गोट’ (GOAT) अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पडद्याबाहेरही ते एकमेकांचे घनिष्ठ मित्र म्हणून ओळखले जातात; अगदी विजय यांच्या राजकीय शपथविधी सोहळ्यालाही त्रिशाने विशेष उपस्थिती लावली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांत विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यांच्या कथित नात्याबद्दल जोरदार अफवा पसरू लागल्या होत्या. या अफवांनंतरच त्रिशाच्या सोशल मीडियावरील वागण्यात हा मोठा बदल दिसून आला आहे.
चाहत्यांनी त्रिशाची ‘फॉलोइंग’ लिस्ट तपासली असता, त्यामधून विजय यांचे नाव गायब असल्याचे समोर आले. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच तिने विजय यांच्या वाढदिवसाला मौन पाळणे आणि त्यांना अनफॉलो करणे, हा त्यांच्यातील दुराव्याचा स्पष्ट संकेत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि इन्स्टाग्रामवरील या कथित कृतीवर त्रिशा किंवा थलपती विजय यांच्यापैकी कोणीही अजून अधिकृत भाष्य केलेले नाही. सोशल मीडियाच्या जगात अतिशय काळजीपूर्वक वावरणाऱ्या या दोन्ही स्टार्सच्या या शांततेमुळे, नक्की पडद्यामागे काय शिजतंय, या प्रश्नाने सध्या चाहत्यांना चक्रावून सोडले आहे.




