अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. दोन्ही गटाचं विलीनीकरण व्हावं, ही अजित पवारांची इच्छा होती. त्या अनुषंगाने त्यांनी बैठका देखील घेतल्या होत्या, असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. पण अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी यूटर्न घेतल्याने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडला.
आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सूचक वक्तव्य केलंय. ज्यावेळी अजित पवारांसोबत विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. तेव्हा सुनेत्रा पवारांसोबत एक दोन वेळा भेट झालेली, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, बारामतीत आम्ही चार पाच जण सुनेत्रा पवारांना भेटलो आणि त्यांना म्हटलं, काही मदत लागली तर सांगा. कोणताही किंतू मनात बाळगू नका. विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरु होती तेव्हा देखील सुनेत्रा वहिनींसोबत एकदोन वेळा भेट झालेली. त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.




