महाराष्ट्राचा दादा माणूस गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठं संकट कोसळलं आहे. अजितदादांच्या (Ajit Pawar) मृत्यूनंतर आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं पण अजितदादांचे जवळचे सहकारी अमोल मिटकरी यांना अद्याप दु:ख सावरता आलं नाहीये. अजित पवारांमुळे आपण स्वत:चं घर बांधू शकलो. भाड्याच्या घरातून स्वत:च्या घरात राहायला येऊ शकलो. यावेळी त्यांनी अजित पवारांची चप्पल चोरल्याची आठवण देखील सांगितली आहे. त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ही आठवण सांगितली आहे.
अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले की, “मी माझं घर, त्या माणसाच्या पुण्याईनं बांधलं होतं. म्हणजे मी आमदार झाल्यावर बँकेनं माझं लोन पास केलं होतं. ६० ते ७० लाखांचं ते लोन होतं. यात मी माझ्या जवळचे काही पैसे टाकून घर बांधलं होतं. तेव्हा माझा हट्ट होता की दादा तुम्ही माझ्या घरी जेवायला या. एकदा-दोनदा म्हटलं पण दादा माझ्यावर ओरडले. मी एक दिवस येईल, असं सांगितलं.” पुढे अजितदादा म्हणाले की “मी पूजापाठ आणि वास्तूपूजा करत नाही. तुला जे करायचं ते करून घे, असं म्हणत त्यांनी यायला नकार दिला. यानंतर मी दादांना न सांगता देवगिरीवरून त्यांची चप्पल चोरली होती, आणि त्याची पूजा केली होती, या घटनेच्या एक महिन्यानंतर दादा माझ्या घरी आले आणि जेवण केलं” अशी आठवण मिटकरींनी सांगितली आहे. तसेच अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत संशयही व्यक्त केला आहे. अजित पवारांचा अपघात झाला असं वाटत नाही, त्यांच्यासोबत घातपातच झाला असावा, असा संशय मिटकरींनी व्यक्त केला. शिवाय अपघातानंतर दादांची बॉडी कशी काय फुलगी? विमानात सहा प्रवासी होते की पाच? यावरूनही त्यांनी सवालही उपस्थित केले.




