अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; विलिनीकरणावर शरद पवारांचा मोठा खुलासा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार? पक्षाची पुढील दिशा काय असणार? या प्रश्नांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्याआधी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत निर्णय १२ तारखेला जाहीर होणार होता, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. तसेच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. विलिनीकरणाच्या चर्चेबाबत विचारणा केली असता त्यांनी सध्या यावर भाष्य करण्यास नकार दिला. “आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. त्यानंतर योग्य वेळी यावर बोलता येईल,” असं त्यांनी सांगितलं.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत शरद पवारांना माहिती नव्हती, या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले की, “दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत जो निर्णय घेतला जाईल, तो पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवण्यात येईल.”
दरम्यान, आजच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




