जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पुन्हा युतीची अपेक्षा बीएमसी निकालानंतर वंचित-काँग्रेस युतीवर प्रश्नचिन्ह
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या रणनीतीवर थेट बोट ठेवत, मुस्लिम मतदारांना गृहीत धरल्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचा दावा केला आहे. मुस्लिम मतदारांनी काँग्रेसपासून अंतर राखले असून हिंदू मतदार आधीच दूर गेले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंबेडकरांनी सांगितले की, काँग्रेसच्या नगरसेवकांचा विजय हा पक्षाच्या नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर झाला आहे. युती असताना मोठ्या जाहीर सभा घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आघाडीला अपेक्षित फायदा मिळू शकला नाही, असा आरोपही त्यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निकालावर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसच्या कामगिरीवर टीका केली. येथे काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली, तर भाजप आणि एमआयएमने मोठी मुसंडी मारली. काँग्रेस आणि वंचित एकत्र लढले असते, तर आघाडीला 40 पेक्षा जास्त जागा मिळू शकल्या असत्या, असा दावा आंबेडकरांनी केला.
दरम्यान, आगामी 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत बोलताना आंबेडकरांनी काँग्रेससोबत पुन्हा युती होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. करारानुसार दोन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जातील, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर पक्षांमध्ये भाजपचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप करत, वंचितने महानगरपालिका निवडणुकांत चांगली कामगिरी केल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.




