महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंनी स्वीकारलं वास्तव, आत्मपरीक्षणाचा निर्धार आणि मराठी अस्मितेसाठी संघर्ष कायम ठेवण्याचा संदेश
मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूक निकालानंतर राजकीय चित्र स्पष्ट झालं असून भाजपने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. मुंबईत तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात येत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने महापालिकेवर वर्चस्व मिळवलं आहे.
या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र आले होते. मराठी माणसाच्या मुद्द्यावर लढत देत ठाकरे बंधूंनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अपेक्षित यश मिळू शकलं नाही.
मुंबई महापालिकेत मनसेने 53 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यापैकी फक्त 6 जागांवर विजय मिळवता आला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत पराभवाचं दुःख व्यक्त केलं आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये निवडणूक लढत ही अत्यंत कठीण असल्याचं सांगत धनशक्ती आणि सत्ताशक्तीविरोधात कार्यकर्त्यांनी दिलेल्या संघर्षाचं कौतुक केलं. अपेक्षित यश मिळालं नसल्याचं मान्य करत त्यांनी पक्ष खचणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि अस्मितेसाठी लढा सुरूच राहील, असं सांगत निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना जाब विचारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच काय चुकलं, कुठे कमतरता राहिली, याचं विश्लेषण करून संघटना नव्याने उभारण्याचा निर्धार राज ठाकरेंनी केला आहे.
“निवडणुका येतात आणि जातात, पण मराठी अस्मिता हीच आपली ओळख आहे,” असा संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने कामाला लागण्याचं आवाहन केलं आहे.




