पुणे महापालिका निवडणुकीत केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात भाजपने भगवा फ़डकवला. भाजपने पुण्यात एकहाती सत्ता खेचून आणली असून राष्ट्रवादी काँग्रेस पुण्याच भुईसपाट झाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता विजयानंतर मुरलीधर मोहोळ यांनी गुलाल उधळला अन् शड्डू देखील ठोकले. मुरली अण्णांनी गाडीवर चढून भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांचा एक डायलॉग व्हायरल होतोय. कुणी बी या… किती बी या… कसंही या! असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ गाण्य़ावर दंड थोपटले.
ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. काही लोक गेले, पण जे राहिले, त्यांनी, ‘कमळ’ हाच आमचा उमेदवार या विचाराने त्यांनी जे काही काम केले, मला त्यांचा अभिमान वाटतो आणि हा विजय मी त्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले. दरम्यान, शेवटी लोक हे विकासाला मत देतात. पुणेकर विकासाला आणि प्रगतीला मत देतात. पुण्याचं भविष्य आणि आमची पुढची पिढी कुठे सुरक्षित राहू शकते, याचा विचार पुणेकर जनता करते. म्हणून मला निश्चितपणे हा विश्वास होता, म्हणून पहिल्या दिवसापासून सांगत होतो की भारतीय जनता पार्टी निश्चितपणे पुन्हा एकदा सत्तेत येईल, पुणेकरांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले.




