राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर (Election) मिनी विधानसभा म्हणून लक्ष लागलेल्या महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध महापालिकेत अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने पक्षाच्या उमदेवारांची मोठी सोय झाली आहे. मात्र, काही ठिकाणी चक्क पक्षाच्या उमेदवारानेच अर्ज माघारी घेतल्याने भाजप-महायुतीच्या उमेदवारांना याचा फायदा होताना दिसून येते. कल्याण डोंबिवली, पनवेल, ठाणे, पुणे आणि मुंबई (Mumbai) महापालिकेतही महाविकास आघाडी किंवा मनसे-शिवसेना युतीच्या काही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याचं चित्र आहे. मुंबईतील 227 जागांसाठी शिवसेना-मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवाराने परस्परपणे आपला अर्ज माघारी घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मुंबईत दुसरा धक्का बसला आहे. कारण, प्रभाग क्रमांक 211 मधील उमेदवार सुफियान अन्सारी यांनी परस्पर उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कोणतीच कल्पना न देता उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतल्याने पक्षात नाराजी उफाळून आली आहे. प्रभाग 211 मध्ये आमदार रईस शेख यांचे स्वीय सहायक वकार खान काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे, आता येथील वार्डात काँग्रेस विरुद्ध समाजवादी पक्ष अशी दुरंगी लढत पार पडणार आहे. दरम्यान, शरद पवारांच्या उमेदवाराने माघार घेतल्याने ठाकरेंच्या युतीला येथे धक्का बसला असून युतीने मतदानापूर्वीच एक जागा गमावली आहे. तर, येथील वार्डात महायुतीकडून उमेदवारच नाही, कारण भाजपच्या उमेदवाराचा येथील अर्ज बाद झाला होता.




