मनसे–शिवसेना (ठाकरे गट) पहिल्यांदाच एकत्र; “सन्मानाने लढतोय, दारात जाऊन जागा मागत नाही,” राऊतांचा टोला
राज्यातील महापालिका निवडणुका जवळ येत असताना राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) पहिल्यांदाच युती म्हणून मैदानात उतरत असून, त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार भाष्य केले. मुंबईत आतापर्यंत शिवसेना भाजपाला जागा देत होती, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचा टोला त्यांनी लगावला. जे स्वतःला शिवसेना म्हणवतात, त्यांना आज भाजपाच्या दारात जाऊन जागा मागण्याची वेळ आली आहे, अशी टीका राऊतांनी केली.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या 60 वर्षांच्या इतिहासात कधीही पक्षाने सत्तेसाठी कोणाच्या दारात उभे राहून तडजोड केली नाही. आम्ही सन्मानाने आघाडीत सहभागी झालो असून सुमारे 140 जागांवर निवडणूक लढवत आहोत. राज ठाकरे यांचा पक्षही मोठ्या संख्येने जागा लढवत आहे, तर काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे गटावर टीका करताना राऊत म्हणाले की, भाजपाने दिलेल्या जागांवर निवडणूक लढवणाऱ्यांना जनता खरी शिवसेना कोणाची आहे, याचा योग्य तो निर्णय देईल. पूर्वी भाजपाशी युती शिवसेनेच्या अटींवर होत होती. स्वाभिमानाला धक्का लागेल अशी भूमिका भाजपाने घेतली, तेव्हा शिवसेना नेहमीच बाजूला झाली, असेही त्यांनी नमूद केले.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून होत असलेली ही टीका राज्यातील राजकारण आणखी तापवणारी ठरत आहे.




