“शुभस्य शिघ्रम… सुरुवात स्वतःपासून करा” म्हणत अंधारेंनी फेसबुक पोस्टमधून राणांना दिला सल्ला
भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलं असून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. एका मौलानाचा दाखला देत “त्यांना ४ बायका आणि १९ मुलं आहेत, तर हिंदूंनी किमान ३ ते ४ मुलं जन्माला घातली पाहिजेत,” असं विधान नवनीत राणांनी केलं होतं. त्यांनी या माध्यमातून “आपला देश पाकिस्तान बनवण्याचा डाव आहे” असा आरोप करत, हिंदूंनी एका मुलावर समाधान मानू नये, असा सल्ला दिला होता.
या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर खोचक शैलीत उत्तर दिलं आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये नवनीत राणांच्या विधानाचा संदर्भ देत उपरोधिक टोला लगावला. “अतिशय चांगला विचार आहे… शुभस्य शिघ्रम. याची सुरुवात नवनीत राणा यांनी स्वतःपासून करायला हवी,” असा सल्ला त्यांनी दिला.
इतकंच नाही, तर “डोहाळजेवणाची जबाबदारी मात्र माझी आणि अॅड. यशोमती ठाकूर ताईंची,” असं म्हणत त्यांनी विनोदी पण बोचरा कटाक्ष टाकला. “लाडक्या भावजयीचे लाड आम्ही नाही पुरवायचे तर कोणी?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, नवनीत राणा यांच्या वक्तव्यावरून समाजात आणि राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली असून, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




