नगरपरिषद निकालांनंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला; महायुतीसमोर महानगरात थेट आव्हान
प्रतिनिधी
नेहा पुरव
महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालानंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट होतेय की जरी सत्ताधारी महायुतीने विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडवला असला तरी .” मविआच्या चौकटीत काँग्रेसने केलेला कमबॅक हा केवळ संघटनात्मक पातळीवरचा बदल नाही, तर तो राजकीय आत्मविश्वास परत मिळाल्याचे स्पष्ट संकेत देणारा आहे. गेले काही काळ काँग्रेस मुंबईत आणि शहरी भागात हळूहळू बाजूला पडत असल्याचे चित्र होते. कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य, नेतृत्वाची कमतरता आणि स्पष्ट राजकीय दिशा नसल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली आहे मात्र अलीकडच्या घडामोडींमुळे काँग्रेस पुन्हा आक्रमक भूमिकेत दिसू लागली आहे.
https://www.facebook.com/share/p/1BoUAMa5bs
याचा थेट परिणाम मविआच्या अंतर्गत राजकारणावरही झाला आहे. काँग्रेस पुन्हा ताकद दाखवू लागल्याने मविआत शक्तिसंतुलन बदलत असल्याचे संकेत आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आता दुय्यम भूमिका न स्वीकारता स्वतंत्र राजकीय स्पेस तयार करण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. हा आत्मविश्वास मुंबईसारख्या महानगरात विशेष महत्त्वाचा ठरतो.
मुंबईत राजकीय लढाई नेहमीच बहुआयामी राहिली असली, तरी सध्याच्या परिस्थितीत चित्र अधिक स्पष्ट होत आहे. शहरी मध्यमवर्ग, झोपडपट्टी भाग, अल्पसंख्याक, कामगार वर्ग आणि नवमतदार या सगळ्या घटकांवर प्रभाव टाकण्याची लढत तीव्र होत चालली आहे. काँग्रेस या घटकांपर्यंत पुन्हा पोहोचण्याचा प्रयत्न करत असून, भाजपच्या मजबूत संघटनात्मक यंत्रणेला थेट आव्हान देण्याची तयारी करत आहे.याचे थेट परिणाम आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत दिसणार आहेत…
भाजपसाठी मुंबई केवळ एक महानगर नाही, तर आर्थिक राजधानी आणि राजकीय प्रतीक आहे. त्यामुळे येथे वर्चस्व टिकवणे हा पक्षाचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. दुसरीकडे काँग्रेससाठी मुंबईतील निर्णायक यश म्हणजे राज्यभर नव्या ऊर्जा आणि विश्वासाचा संचार होण्यासारखे ठरेल. त्यामुळे ही लढाई केवळ स्थानिक राहणार नाही, तर तिचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात उमटतील.
एकूणच पाहता, मुंबईत आता सामना निश्चित झाल्यासारखा आहे. तिहेरी किंवा गोंधळाची लढत न होता भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी सरळ आणि टोकाची लढाई आकाराला येत आहे. मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, यापेक्षा ही लढाई राजकीय प्रवाह बदलणारी ठरणार का, हा खरा प्रश्न आहे. मुंबईचा निर्णय हा आगामी काळातील महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरू शकतो.




