देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, शेवटचा घाव कुणावर घालणार?
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीतील माणिक मोती गळाल्याचा संदर्भ देत टीकेची झोड उठवली. त्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टप्प्याटप्प्याने गेम करतील असा सूचक इशारा महायुतीतील दोन घटक पक्षांना दिला आहे. पुढे शिंदेंचा पक्ष अस्तित्वात असेल का? अशी शंकाही संजय राऊतांनी उपस्थित केली.
धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावर त्यांनी भाष्य केले. अजूनही वाल्मिक कराड तुरुंगात आहे. अजूनही खटला संपलेला नाही. अशावेळी ज्यांच्यावरती गंभीर स्वरुपाचे आरोप होते, त्यांना मंत्रिमंडळात परत घेण्याचं पाप फडणवीस करतील असे मला वाटत नाही. फडणवीस मंत्रिमंडळातील एकाच गटाचे दोन मंत्री, भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी मुळे गेले. ही या सरकारला लागलेली काळीमा आहे. खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत. त्यांना तात्काळ बरखास्त करायला हवे. पैशांच्या बॅगा दिसत आहेत. इतर ही अनेक विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील आणि शेवटचा घाव ते मिंध्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू आहे. सरकार त्यातून संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या मागे उभे राहतो हा संदेश या प्रकरणातून देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी, जे आमदार-खासदार, मंत्री भ्रष्टाचारी आहेत, त्यांनी आमच्या पक्षात यावं, त्यांना पूर्ण संरक्षण मिळेल हाच तो संदेश आहे, तसं नसतं तर काल अमित शाह धनंजय मुंडे यांना भेटले नसते. या भेटीतूनही तोच संदेश देण्यात आला आहे. काही करा आणि आमच्याकडे या. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा संदेश महाराष्ट्रात फडणवीस देत आहेत. तर दिल्लीत अमित शाह हे देत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.
अजित पवारांशी युती करणं ही भाजपशी हातमिळवणी असल्याचे आम्ही मानतो असे मोठे वक्तव्य राऊतांनी केले. तर अजित पवार हे भाजपचे हस्तक असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर ते नाराज असल्याचे दिसून आले. आज शरद पवार यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी आघाडीत बाबत चर्चा होईल. राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू आहे. तर काँग्रेसचाही संदश आला आहे. मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधुंचाच असेल. महापौर हा अस्सल मराठी माणूसच असेल असे संजय राऊत यांनी सांगितलं.




