Minister Girish Mahajan BJP Morcha : मोर्चे काढले तर रस्ते जाम होणारच! घटनेवर मंत्री गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण”

spot_img

महिला आरक्षणाचा ‘जनआक्रोश’ आणि वाहतूक कोंडीचा ‘प्रक्षोभ’; गिरीश महाजन यांनी मांडली आपली बाजू

मुंबईतील जांबोरी मैदानात काल भाजपच्या वतीने आयोजित ‘जनआक्रोश’ मोर्चाने केवळ राजकीय वातावरणच तापवले नाही, तर वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांच्या धैर्याचा अंत पाहिला. या गोंधळात एका संतप्त महिलेने थेट कॅमेऱ्यासमोर कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आपला राग काढला आणि ही दृश्ये देशभर व्हायरल झाली. या संपूर्ण प्रकरणावर आज गिरीश महाजन यांनी भाष्य केले असून, आंदोलनादरम्यान अशा गोष्टी घडतात, असे म्हणत त्यांनी एक प्रकारे या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, “मोर्चांमुळे ५०-५० किलोमीटरचे हायवे जाम झालेले आम्ही पाहिले आहेत,” असे विधान करून त्यांनी नव्या वादाला निमंत्रण दिले आहे.

महाजन यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले की, कालचा मोर्चा हा काँग्रेसने महिला आरक्षण बिलाविरोधात घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी होता. हजारो महिला त्यात सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान एका भगिनीचा राग अनावर झाला, त्या अयोग्य भाषेत बोलल्या आणि त्यांनी बाटली देखील फेकून मारली. महाजन यांच्या मते, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण “महिलांच्या आरक्षणासाठीच हा मोर्चा असल्याने त्यांना बोलू द्या,” असे सांगत आपण संयम पाळल्याचा दावा त्यांनी केला. ही घटना सायंकाळच्या वेळी घडली असून, मोर्चासाठी रीतसर परवानगी घेतली होती आणि मार्गही ठरलेला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

“त्या महिलेला आपला राग सौम्य भाषेतही व्यक्त करता आला असता, परंतु त्यांनी ज्या शब्दांचा वापर केला तो संयुक्तिक नव्हता,” असे महाजन म्हणाले. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास झाला हे मान्य करत, त्यांनी यापुढे अशा आंदोलनांच्या वेळी अधिक काळजी घेण्याचे आश्वासन दिले. सर्वच राजकीय पक्ष मोर्चे काढतात आणि त्यावेळी अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते, असे समर्थन करत त्यांनी कालच्या घटनेबद्दल दिलगिरीपेक्षा परिस्थितीचे स्पष्टीकरण देण्यावरच अधिक भर दिला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ