देशातील वाढत्या इंधन गरजा आणि क्रूड ऑईलवरील आयातीचे अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने E100 इंधनाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये यासंदर्भातील नियमांना मंजुरी दिल्याची माहिती दिली. यापूर्वी E20 आणि E85 इंधनाच्या वापराला प्रोत्साहन दिल्यानंतर आता 100 टक्के इथेनॉलवर आधारित E100 इंधनामुळे पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
E100 हे पूर्णपणे इथेनॉलपासून तयार होणारे इंधन आहे. ऊस, मका, तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनांच्या प्रक्रियेतून इथेनॉलची निर्मिती केली जाते. त्यामुळे या इंधनाच्या वापरामुळे केवळ पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होणार नाही, तर कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होऊ शकतो. इथेनॉल उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सरकारच्या मते, इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे आतापर्यंत देशाचे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन वाचले असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
दरम्यान, वाहन उद्योगातही या बदलाची तयारी सुरू झाली आहे. आगामी काळात विविध वाहन उत्पादक कंपन्या फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानावर आधारित वाहने बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. ही वाहने पेट्रोल तसेच इथेनॉलयुक्त इंधनावर चालू शकतील. त्यामुळे ग्राहकांना पर्यायी इंधनाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
तथापि, E100 च्या व्यापक वापरासाठी काही आव्हानेही आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या बहुतांश वाहनांमध्ये हे इंधन वापरता येणार नाही. तसेच देशभरातील पेट्रोल पंपांवर E100 वितरणासाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा उभारण्याची आवश्यकता आहे. फ्लेक्स फ्युएल वाहनांची किंमत तुलनेने जास्त असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तरीही दीर्घकालीन दृष्टीने पाहता, E100 इंधन भारताच्या ऊर्जा क्षेत्रात आणि वाहन उद्योगात महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवून आणणारे पाऊल ठरू शकते.




