होर्मूजच्या सामुद्रधुनीतून ‘जग विक्रम’ची यशस्वी सुटका; २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारताच्या दिशेने
गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आता दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या ‘युद्धविरामाची’ घोषणा करण्यात आली आहे. या युद्धविरामासाठी सध्या पाकिस्तानमध्ये दोन्ही देशांत अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू आहे. इराणने अमेरिकेसमोर जप्त केलेली संपत्ती मुक्त करण्याची आणि लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची अट ठेवली होती. मात्र, अमेरिकेने संपत्ती सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने या वाटाघाटींत पुन्हा एकदा अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिकेने या बदल्यात इराणला ‘स्ट्रीट ऑफ होर्मूज’ (Strait of Hormuz) हा महत्त्वाचा सागरी मार्ग पूर्णपणे खुला करण्याची अट घातली आहे, जी इराणने अद्याप पूर्णपणे मान्य केलेली नाही.
इराणने हा सागरी मार्ग मर्यादित स्वरूपात सुरू ठेवला असून, दिवसाला केवळ १५ जहाजांनाच परवानगी देण्याचे धोरण अवलंबले आहे. या जागतिक तणावाच्या वातावरणात भारतासाठी मात्र एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारताचे ‘जग विक्रम’ नावाचे मालवाहू जहाज होर्मूजची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करून भारताच्या दिशेने रवाना झाले आहे. युद्धविरामानंतर हा सागरी मार्ग ओलांडणारे हे पहिलेच भारतीय जहाज ठरले आहे. शुक्रवारी मध्यरात्री या जहाजाने आपली सुटका करून घेतली असून, इराणने हा मार्ग बंद केल्यानंतर बाहेर पडणारे हे भारताचे ९ वे जहाज आहे.
विशेष म्हणजे, हे जहाज २० हजार टन एलपीजी (LPG) गॅस घेऊन येत आहे. या जहाजाची एकूण क्षमता २६ हजार टन असून, इतक्या मोठ्या प्रमाणात गॅसचा पुरवठा भारतात होणार असल्याने देशातील इंधन टंचाईच्या संकटावर काही प्रमाणात मात करणे शक्य होणार आहे. अजूनही भारताची १५ जहाजे याच वादग्रस्त सागरी मार्गावर अडकून पडली आहेत, मात्र ‘जग विक्रम’च्या मायदेशाकडे होणाऱ्या प्रवासामुळे भारतीय प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आता इराण आणि अमेरिकेतील हा तात्पुरता युद्धविराम कायमस्वरूपी शांततेत बदलणार की तणाव आणखी वाढणार, याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत.




