महाकुंभ मेळ्यामुळे चर्चेत आलेली इन्फ्लुएंसर मोनालिसा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने अलीकडेच फरमान खानसोबत विवाह केला असून, या लग्नानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, तिच्या कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध दर्शवला असून, यामुळे दोघांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला आहे.
या प्रकरणाला काही जणांनी ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप दिले असून, दोघांनाही देशभरातून धमक्या येत असल्याचे समोर आले आहे. मोनालिसाच्या पालकांनी आणि सनोज मिश्रा यांनी फरमानविरोधात तक्रार दाखल करत त्याच्यावर फसवणुकीचे आरोप केले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोनालिसाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मदतीची मागणी केली होती. त्यानंतर या जोडप्याने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. फरमान खानने स्वतःवर होत असलेले आरोप फेटाळून लावत, आपण कोणत्याही चुकीच्या कृत्यात सहभागी नसल्याचे स्पष्ट केले. लोकांनी चुकीचे समज करून घेतल्याची खंतही त्याने व्यक्त केली.
त्याने सांगितले की, आपल्यावर केवळ धर्माच्या आधारे आरोप केले जात आहेत आणि त्यामुळे त्यांना जीवाला धोका निर्माण झाला आहे. दोघांनीही शांततेने आयुष्य जगण्याची इच्छा व्यक्त करत, या प्रकरणाला अनावश्यकपणे राजकीय किंवा धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन केले.
फरमानने पुढे सांगितले की, त्यांचे लग्न धार्मिक स्थळी पार पडले असून, त्यात मोनालिसाच्या कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते. मात्र, लग्नानंतर कुटुंबीयांकडून विरोध वाढला असल्याचे त्याने सांगितले. सध्या या संपूर्ण प्रकरणामुळे दोघांवर मानसिक आणि सामाजिक दबाव वाढला असून, परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे.




