आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिक शहरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात दाखल झाली. “हरी मुखे म्हणा” आणि विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात हजारो वारकरी टाळ-मृदुंगाच्या तालावर पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान केल्यानंतर पालखीने काल महिरावणी येथे मुक्काम केला होता. आज सकाळी नाशिकमध्ये पालखीचे आगमन होताच शहरातील वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. भगवे ध्वज, पताका आणि विठ्ठलनामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. नाशिकमध्ये पालखीचे पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी लोकप्रतिनिधी, साधू-महंत आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीच्या स्वागतासाठी जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले. वारकऱ्यांनी अभंग, भजन आणि हरिनाम संकीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठलभक्तीचा अनोखा सोहळा अनुभवला. आता संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पुढील प्रवासासाठी पंढरपूरकडे रवाना झाली असून, विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने लाखो भाविक या पवित्र वारीत सहभागी होत आहेत.




