राज्यातील हवामानाचा अंदाज पाहता येत्या काही तासांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही भागांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया या भागांसाठी यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अनेक ठिकाणी पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि नदी-नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे विशेषतः घाटमाथा परिसर आणि पूरप्रवण भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




