राज्यातील तापमान चाळीशीच्या पुढे गेल्यामुळे उष्णतेचा परिणाम केवळ माणसांवरच नाही, तर आपल्या दैनंदिन वापरातील फळांवरही होत आहे. बाजारातून आणलेली ताजी फळे काही वेळातच सुकणे किंवा सडणे सुरू होते, ही समस्या अनेक घरांमध्ये दिसून येते. मात्र काही साध्या साठवणुकीच्या उपायांचा वापर केल्यास फळे अधिक काळ ताजी ठेवणे शक्य आहे.
फळे टिकवण्यासाठी सर्वप्रथम त्यांची योग्य पद्धतीने मांडणी करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, केळी इतर फळांसोबत ठेवल्यास ती लवकर काळी पडतात. त्यामुळे केळी वेगळी ठेवावीत आणि त्यांच्या देठाला अॅल्युमिनियम फॉइल गुंडाळल्यास ती अधिक काळ टिकतात. द्राक्षे किंवा स्ट्रॉबेरी यांसारखी फळे खाण्याच्या आधीच धुवावीत. आधी धुऊन ठेवली तर त्यावर बुरशी येण्याची शक्यता वाढते.
कलिंगडासारखी मोठी फळे कापल्यानंतर लगेच खाणे उत्तम. जर ते साठवायचे असल्यास कापलेल्या भागावर क्लिन फिल्म लावून फ्रिजमध्ये ठेवावे. तसेच फळे प्लास्टिकमध्ये घट्ट बांधून ठेवण्याऐवजी जाळीदार टोपली किंवा कागदी पिशवीत ठेवली तर त्यांचा ताजेपणा अधिक काळ टिकतो. सफरचंद, केळी आणि आंबे या फळांतून एथिलीन वायू बाहेर पडतो, जो इतर फळांना लवकर खराब करतो. त्यामुळे ही फळे वेगळी ठेवणे योग्य ठरते. आंब्यांसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ते घरी आणल्यानंतर काही वेळ पाण्यात भिजवून ठेवावेत, यामुळे त्यांची उष्णता कमी होते. पूर्ण पिकलेले आंबे फ्रिजमध्ये ठेवावेत, पण कच्चे आंबे बाहेरच ठेवले तर ते नैसर्गिकरीत्या पिकतात. या छोट्या-छोट्या उपायांनी तुम्ही उन्हाळ्यातही फळांचा ताजेपणा टिकवून ठेवू शकता आणि अन्नाची नासाडी टाळू शकता.




