अमेरिका-इस्रायल हल्ल्यानंतर सागरी वाहतूक विस्कळीत; भारताच्या २८ जहाजांवर सरकारची सतत नजर.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या इंधन वाहतुकीच्या मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सूत्रांच्या माहितीनुसार इराणने भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर या मार्गावरील सागरी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक जहाजांची हालचाल मर्यादित झाली आहे.
यापूर्वी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) च्या नौदल प्रमुखांनी स्पष्ट केले होते की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना इराणची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास त्या जहाजांवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला होता. रिअर ॲडमिरल अलीरेझा तांगसिरी यांनी सांगितले की, बुधवारी इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोन जहाजांवर सामुद्रधुनीत कारवाई करण्यात आली.
इराणच्या एका अधिकाऱ्याने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाचे आश्वासन दिले गेले होते का, हा प्रश्न ‘एक्सप्रेस रोम’ आणि ‘मयुरी नारी’ या जहाजांच्या कर्मचाऱ्यांना विचारला पाहिजे. या जहाजांनी इराणच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून मार्ग पार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले, असा दावा त्यांनी केला. तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक जहाजाने इराणची मंजुरी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवरील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. मात्र, अमेरिका किंवा इस्रायलच्या हितासाठी काम न करणाऱ्या देशांची जहाजे सुरक्षितपणे या मार्गाने जाऊ शकतात, असे इराणने म्हटले आहे. इराण आणि ओमानच्या किनाऱ्यांदरम्यान असलेल्या या अरुंद सामुद्रधुनीतून दररोज २ कोटी बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेल वाहतूक केले जाते. जागतिक तेल वापराच्या सुमारे पाचव्या भागाएवढा आणि समुद्री तेल व्यापाराच्या जवळपास चतुर्थांश पुरवठा या मार्गावर अवलंबून आहे. तसेच मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू (LNG) वाहतूकही याच मार्गाने होते.
दरम्यान, भारताच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या पर्शियन गल्फ परिसरात भारतीय ध्वज असलेली २८ जहाजे कार्यरत आहेत. यापैकी २४ जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेला असून त्यावर ६७७ भारतीय खलाशी आहेत, तर ४ जहाजे पूर्वेकडे असून त्यावर १०१ खलाशी कार्यरत आहेत. या सर्वांच्या सुरक्षिततेवर सरकारकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
परिस्थितीवर सतत नजर ठेवण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२६ पासून मंत्रालय आणि डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंगमध्ये २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. भारतीय खलाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकारी, जहाज व्यवस्थापक आणि भरती संस्था भारतीय दूतावास तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.




