महाराष्ट्र दिनापासून राज्यातील परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, यावरून राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या नव्या नियमांनुसार मराठी वाचता, लिहिता किंवा बोलता न येणाऱ्या चालकांवर कारवाई होऊ शकते, इतकंच नव्हे तर त्यांचे परवाने रद्द करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
या निर्णयाविरोधात रिक्षा-टॅक्सी चालक आणि मालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, या नियमामुळे लाखो चालकांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो. राज्यात सुमारे १५ लाख रिक्षा असल्याने हा निर्णय मोठ्या प्रमाणावर कुटुंबांवर परिणाम करणारा ठरू शकतो, असा दावा संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ४ मेपासून राज्यातील विविध भागांमध्ये बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो तसेच निवासी आणि व्यापारी परिसरात—दररोज आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या मुद्द्यावर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, कलाविश्वातील काही व्यक्तींनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. मराठी अभिनेता अंशुमन विचारे यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट करत, “मराठी मातीत कमवायचं असेल तर मराठीला प्राधान्य दिलंच पाहिजे,” असा ठाम संदेश दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं आहे.
एकीकडे भाषेच्या जपणुकीचा मुद्दा पुढे येत असताना, दुसरीकडे रोजगारावर होणाऱ्या परिणामाची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा निर्णय पुढे काय वळण घेतो आणि सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




