राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत हालचालींना वेग आलेला असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खासदार पार्थ पवार यांच्यावर पुन्हा एकदा कठोर शब्दांत टीका केली आहे. पार्थ पवार यांच्या वागणुकीत अहंकार दिसून येत असून ते स्वतःची स्वतंत्र गटबांधणी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अजित पवारांनंतर पक्षाचे नेतृत्व आपणच करत आहोत, अशी भावना त्यांच्या हालचालींतून स्पष्ट जाणवत असल्याचे दमानिया म्हणाल्या.
माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पार्थ पवार सध्या पक्षातील अनेक निर्णय स्वतःच्या पद्धतीने घेत आहेत. त्यामुळे काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचाही उल्लेख करत पक्षात धूसफूस सुरू असल्याचा दावा केला. पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील गणित पार्थ पवार पाहत असल्याने संघटनेत अस्वस्थता वाढताना दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सरन्यायाधीशांच्या “झुरळ” या उल्लेखावर प्रतिक्रिया देताना दमानिया म्हणाल्या की, त्या वक्तव्यामुळे धक्का बसला असला तरी जर सरन्यायाधीशांनी तसे म्हटले असेल तर त्याचा अभिमान वाटतो. तसेच सत्ताधाऱ्यांचे सध्याचे वर्तन विचित्र आणि संविधानविरोधी असल्याची टीका करत संबंधितांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.




