प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्या ‘देवखेळ’ (Deokhel) या वेब सीरिजची चर्चा सर्वत्र आहे. सात एपिसोडची ही वेबसीरीज 30 जानेवारी रोजी ‘Zee 5’ याओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोकणवासियांनी या वेब सीरिजचा विरोध केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वेबसीरीजला विरोध होत असताना ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोकणातील देवतळी गावातील गोष्ट पाहायला मिळते. देवतळी हे गाव काल्पनिक आहे. कोकणामध्ये होळीच्या वेळी शंकासुर पाहायला मिळतो. शंकासुर जो व्यक्ती पाप करतो, त्याला शंकासूर शिक्षा करतो, असं गावातल्या लोकांची समज आहे. याच गावात विश्वास सरंजामे हा पोलिस इन्स्पेक्टर येतो. श्रद्धेला स्थान असावं, अंधश्रद्धेला नाही असे म्हणत गेल्या 15 वर्षांपासून दरवर्षी होणार्या खूनामागे नेमके कोण आहे, हे तो शोधून काढतो. असं या वेबसीरीजचं कथानक आहे. मात्र, ही वेबसीरीज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ‘देवखेळ’ वेब सीरिजमुळे कोकणवासीयांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे वेबसीरीजच्या निर्मात्यांवर आणि दिग्दर्शकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ‘देवखेळ’ वेब सीरिजमुळे कोकणात अंसतोष निर्माण झाल्यामुळे ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबद्दल त्यांनी एक्स (ट्वीटर) पोस्ट शेअर केली आहे.




