भाजपचा राज्यात दबदबा, तर मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला; गुरुवारी मतदान, शुक्रवारी निकाल
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली महापालिका निवडणुकांची रणधुमाळी अखेर मंगळवारी प्रचाराच्या सांगतेने थांबली आहे. आता गुरुवारी राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार असून, शुक्रवारी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
यावेळी महापालिका निवडणुकांकडे विशेष लक्ष लागले आहे. राज्यभर भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली असताना, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
मागील निवडणुकांमध्ये एकूण 27 महापालिकांसाठी मतदान झाले होते. मात्र यंदा जालना आणि इचलकरंजी या दोन नव्या महापालिकांची भर पडल्याने एकूण संख्या 29 झाली आहे. मागील निकालांचा आढावा घेतला असता भाजपने जोरदार कामगिरी करत 17 महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. याशिवाय 3 महापालिकांमध्ये भाजप–शिवसेना युतीची सत्ता होती.
त्या वेळी शिवसेनेला केवळ दोन महापालिकांमध्ये सत्ता मिळाली होती. काँग्रेसकडे तीन महापालिका होत्या, तर एका ठिकाणी काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस युतीची सत्ता होती. वसई–विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीने सत्ता मिळवली होती. या पार्श्वभूमीवर यंदाही भाजप आपला दबदबा कायम ठेवते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मागील महापालिका निवडणुकांतील सत्तास्थिती (संक्षिप्त आढावा):
- मुंबई (227): शिवसेना
- ठाणे (131): शिवसेना
- कल्याण-डोंबिवली (122): शिवसेना–भाजप
- अहिल्यानगर (68): शिवसेना–भाजप
- छत्रपती संभाजीनगर (113): शिवसेना–भाजप
- नवी मुंबई (111): भाजप
- उल्हासनगर (78): भाजप
- मिरा-भाईंदर (96): भाजप
- पनवेल (78): भाजप
- नाशिक (122): भाजप
- जळगाव (75), धुळे (74), मालेगाव (84): भाजप
- पुणे (162 नगरसेवकांपैकी 42): भाजप
- पिंपरी-चिंचवड (128 पैकी 32): भाजप
- सोलापूर (113), सांगली-मिरज-कुपवाड (78), लातूर (70), अमरावती (87), अकोला (80), नागपूर (151), चंद्रपूर (66): भाजप
- भिवंडी-निजामपूर (90): काँग्रेस
- नांदेड-वाघाळा (81), परभणी (65): काँग्रेस
- वसई-विरार (115 पैकी 29): बहुजन विकास आघाडी
- कोल्हापूर (92): काँग्रेस–राष्ट्रवादी
- नवीन महापालिका:
- इचलकरंजी (76)
- जालना (65)
या सर्व पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने झुकतो, भाजप आपली आघाडी कायम ठेवते का, आणि मुंबईत ठाकरे गटाला किती यश मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.




