सर्व डाळी सारख्या नसतात; पचनशक्ती आणि शरीरप्रकारानुसार डाळींची योग्य निवड महत्त्वाची
भारतीय आहारात डाळींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोजच्या जेवणात कुठली ना कुठली डाळ असतेच. विशेष म्हणजे काही डाळी पोषणमूल्यांच्या बाबतीत मटणालाही टक्कर देतात. डाळींमधून शरीराला प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि आवश्यक खनिजे मिळतात, ज्यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. मात्र, प्रत्येक डाळीचा शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो. त्यामुळे डाळ निवडताना आपल्या पचनशक्तीचा आणि शरीराच्या गरजांचा विचार करणे आवश्यक आहे.
मूग डाळ ही सर्वांत हलकी आणि सहज पचणारी डाळ मानली जाते. तज्ज्ञांच्या मते ती पोटावर जड जात नाही आणि गॅस, अॅसिडिटीसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारपणातून सावरत असलेल्यांसाठी मूग डाळ उत्तम पर्याय ठरते.
मसूर डाळ लोहाने (आयर्न) समृद्ध असल्यामुळे रक्ताल्पता असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. ती शरीराला ऊर्जा देते आणि थकवा कमी करण्यास मदत करते. मात्र, काहींच्या पचनसंस्थेला ती थोडी जड जाऊ शकते, त्यामुळे संवेदनशील पचन असणाऱ्यांनी मर्यादित प्रमाणातच तिचे सेवन करावे.
चणाडाळ ही प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. ती हळू पचत असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे मधुमेहींसाठी उपयुक्त ठरते. मात्र, ही डाळ जड असल्याने नीट शिजवून आणि प्रमाणात खाणे गरजेचे आहे.
तूर डाळ ही रोजच्या आहारासाठी संतुलित मानली जाते. ती ना फार हलकी असते ना फार जड. तूर डाळ शरीराला आवश्यक पोषण देऊन ताकद आणि दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.
उडीद डाळ हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी ओळखली जाते. कॅल्शियम आणि पोषक घटकांनी समृद्ध असली तरी ती गॅस, अॅसिडिटी किंवा मूळव्याध वाढवू शकते. त्यामुळे अशा तक्रारी असलेल्या लोकांनी तिचे सेवन काळजीपूर्वक करावे.
एकूणच, डाळी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्या तरी योग्य डाळीची निवड, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने शिजवणूक महत्त्वाची आहे. आपल्या शरीराच्या गरजेनुसार डाळींचा समावेश केल्यास आहार अधिक पोषक आणि संतुलित ठरतो.




