टी-20 वर्ल्डकपची तयारी लक्षात घेऊन स्टार खेळाडूंना वनडे मालिकेत विश्रांती; इशान किशनची संघात परत येण्याची शक्यता
नव्या वर्षात टीम इंडियाचा पहिला सामना 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत होणार आहे. मात्र, अद्याप एकदिवसीय संघ जाहीर झालेला नाही. संघाची घोषणा नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, क्रिकबझच्या अहवालानुसार स्टार विकेटकीपर ऋषभ पंतला बाहेर ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्याचसोबत हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना देखील या वनडे मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे आगामी टी-20 वर्ल्डकप 2026, जो 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, आणि दोघेही या विश्वचषकात टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू असतील.
हार्दिक आणि बुमराह या दोघांनी 2024 मधील टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतासाठी निर्णायक कामगिरी बजावली होती, विशेषतः दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात बुमराहच्या गोलंदाजीने सामना जिंकण्यास मदत केली होती.
वनडे मालिकेत नसतानाही दोघे 21 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत परत येतील. ही मालिका आगामी वर्ल्डकपसाठी तयारीची संधी ठरू शकते.
अहवालानुसार, वनडे मालिकेत नसतानाही हार्दिक पंड्या देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीत बडोद्यासाठी किमान दोन सामने खेळू शकतो. परंतु स्टार गोलंदाज बुमराहला देशांतर्गत स्पर्धेतून सुट देण्यात आली आहे.
सिलेक्शनबद्दल बोलायचं झालं, तर टीम इंडियाची घोषणा 3 किंवा 4 जानेवारीला ऑनलाइन बैठकीत होऊ शकते. ऋषभ पंतच्या जागी इशान किशन वनडे संघात परत येण्याची शक्यता आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत आणि विजय हजारे ट्रॉफीत दमदार कामगिरी केली आहे.




