आंध्रप्रदेशविरुद्ध 131 धावांची तुफान खेळी, लिस्ट-A मधील 58वे शतक; विराटच्या फॉर्मने टीकाकारांना दिले सडेतोड उत्तर
बुधवारी, 24 डिसेंबर रोजी विजय हजारे करंडकात विराट कोहलीने (Virat Kohli) आपला जुना फॉर्म परत आल्याचं ठळकपणे दाखवून दिलं. आंध्रप्रदेशविरुद्ध खेळताना त्याने 131 धावांची अप्रतिम खेळी साकारत दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 299 धावांचं आव्हान दिल्लीने अवघ्या 38 षटकांत पूर्ण करत विराटच्या बॅटची धार किती तीव्र आहे, हे स्पष्ट केलं.
अलीकडच्या काळात विराट जबरदस्त लयीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) वनडे मालिकेत दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावून त्याने सातत्य सिद्ध केलं होतं. मात्र, काही सामन्यांत विश्रांती देण्यात आल्यामुळे त्याच्या भवितव्याबाबत चर्चा रंगल्या होत्या. विशेषतः 2027 चा वनडे विश्वचषक तो खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.
या चर्चांना आता विराटचा बालमित्र आणि कोच राजकुमार शर्मा यांनी पूर्णविराम दिला आहे. वृत्तसंस्था ANI शी बोलताना राजकुमार शर्मा म्हणाले की, विराट पूर्णपणे तंदुरुस्त असून 2027 च्या विश्वचषकासाठी सज्ज आहे. सध्या त्याची फलंदाजी सर्वोच्च पातळीवर असून तो सातत्याने धावा करत आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करत त्याने चमकदार कामगिरी केली असून भारतीय संघातील आपलं स्थान अधिक भक्कम केलं आहे.
या सामन्यातील शतकासह विराटने लिस्ट-A क्रिकेटमधील आपलं 58वं शतक पूर्ण केलं. दिल्लीसाठी हे त्याचं पाचवं लिस्ट-A शतक ठरलं. त्याने 330 डावांत 16,130 धावा करत लिस्ट-A मध्ये 16 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.
आज, 26 डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचा सामना गुजरातमध्ये जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विराट पुन्हा शतक झळकावणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे रोहित शर्माही दमदार फॉर्ममध्ये असून वैभव सूर्यवंशीची बॅट तळपत आहे. अनुभवी खेळाडूही स्थानिक क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.




