आम्लयुक्त आणि खारट पदार्थ स्टीलशी रासायनिक प्रतिक्रिया देतात; योग्य भांडे निवडणे आवश्यक
भारतीय घरात स्टीलची भांडी आणि डबे हे हमखास वापरले जाणारे साधन. शिजवण्यापासून ते उरलेलं अन्न ठेवण्यापर्यंत स्टीलची भांडी अनेक कामांत उपयोगी पडतात. पण प्रत्येक पदार्थ स्टीलच्या भांड्यात ठेवणं सुरक्षितच असेल असं नाही. काही पदार्थ स्टीलशी प्रतिक्रिया देतात आणि याचा परिणाम पदार्थांच्या चवीवर आणि आपल्या आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे कोणते पदार्थ स्टीलपासून दूर ठेवावेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
दही
दही हे नैसर्गिकरीत्या आम्लयुक्त असतं. त्यामुळे दही स्टीलच्या भांड्यात जास्त वेळ ठेवलं तर ते लगेच आंबट होतं आणि त्याची चव व टेक्स्चर बिघडू शकतं. दही नेहमी काच, माती किंवा चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकच्या डब्यात ठेवणंच उत्तम.
कापलेली फळे
टरबूज, पपई, सफरचंद, संत्री यांसारखी फळे कापल्यानंतर स्टीलच्या डब्यात ठेवल्यास त्यांच्या चवीत बदल होतो आणि रंगही फिका पडतो. त्यामुळे अशी फळे काचेचे किंवा प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवणे योग्य.
टोमॅटो किंवा टोमॅटो बेस्ड पदार्थ
टोमॅटोही आम्लयुक्त असल्याने सूप, प्युरी किंवा सॉस स्टीलच्या डब्यात साठवला तर चव जास्त आंबट होते आणि रंगही बदलतो. हे पदार्थ काचेच्या किंवा सिरेमिकच्या डब्यात ठेवावेत.
लोणचे
लोणच्यात मीठाचे प्रमाण जास्त असते. मीठ स्टीलशी प्रतिक्रिया करून लोणच्याची चव बदलू शकते. त्यामुळे लोणचं नेहमी काचेच्या बाटल्यांत किंवा सिरेमिकच्या बरण्यांतच साठवावं.
लिंबू, डाळिंब, आवळा
हे पदार्थ आम्लयुक्त असल्याने स्टीलच्या भांड्यांचा रंग खराब करतात आणि अन्नाची चववेगळं बनवतात. त्यामुळे हे पदार्थ प्लास्टिक किंवा काचेच्या डब्यात ठेवणं सुरक्षित.
शेवटी लक्षात ठेवण्यासारखे
स्टीलच्या भांड्यात केवळ कमी आम्ल किंवा कमी मीठ असलेले पदार्थच ठेवावेत. दही, लोणचे, टोमॅटोच्या रेसिपी, कापलेली फळे आणि लिंबू यांसारखे पदार्थ स्टीलमध्ये ठेवणे आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. योग्य भांड्याचा वापर केल्यास चवही टिकते आणि आरोग्यही सुरक्षित राहते.




