दिल्लीतील जंतर-मंतरवर CJP अर्थात कॉक्रेज जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या NEET पेपरफुटीविरोधी आंदोलनाची देशभरात चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणावर केंद्र सरकारने थेट भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. विविध विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने या मुद्द्याला राजकीय रंगही चढला आहे.
CJPच्या शिष्टमंडळातील सौरव दास यांनी माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्त्यांची भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही राजकीय नेत्याच्या घरी जाऊन बंद दाराआड चर्चा करण्यास आम्ही तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकार किंवा नेत्यांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करायची असेल, तर त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी थेट संवाद साधावा, अशी मागणी त्यांनी केली.
NEETसह विविध स्पर्धा परीक्षांतील कथित गैरप्रकारांचा परिणाम लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत असल्याने हा प्रश्न केवळ एका संघटनेपुरता मर्यादित नसल्याचे CJPचे म्हणणे आहे. दरम्यान, आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता केंद्र सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत बैठक निश्चित झालेली नाही. त्यामुळे सरकार जंतर-मंतरवर येऊन संवाद साधते का, याकडे लक्ष लागले आहे.




